Tuesday 27 September 2022

सय्यद (सय्यिद) घराणे

सय्यद (सय्यिद) घराणे : दिल्लीच्या तख्तावर सत्तेवर (इ. स. १४१४-१४५१) असलेले एक सुलतान घराणे. या घराण्याचे पूर्वज अरबस्तानातून हिंदुस्थानात आले आणि मुलतान येथे स्थायिक झाले. या घराण्यात खिज्रखान (कार. १४१४-२० मे १४२१), मुबारकशाह (कार. १४२१-१९ फेबुवारी १४३४), मुहम्मदशाह (कार. १४३४-१४४५) आणि अलाउद्दीन आलमशाह (कार. १४४५-१४५१) असे चार सुलतान झाले.

खिज्रखान हा पहिला सुलतान फिरोझशाह तुघलक (कार. १३५१- १३८८) याच्या कारकीर्दीत मुलतानचा सुभेदार होता. दीपालपूरचा सुभेदार सारंगखान लोदी याने खिज्रखानाचा पराभव करून मुलतान घेतले, तेव्हा काही वर्षे त्याने मेवातमध्ये काढली. त्यानंतर तैमूरलंगने हिंदुस्थानवर स्वारी करून दिल्ली काबीज केली (१३९८). त्याने खिज्रखानास मुलतान, लाहोर व दीपालपूर यांची सुभेदारी आणि दिल्लीत आपला राजप्रतिनिधी नेमले. त्यावेळी दिल्लीचा तुघलक सुलतान नसीरूद्दीन मुहम्मदशाह गुजरातला पळून गेला होता. तुघलकांच्या मालइकबाल वजीराने त्याला परत बोलावून दिल्लीच्या तख्तावर बसविले परंतु प्रत्यक्षात सत्ता दौलतखान लोदी याच्या हातात होती. खिज्रखानाने मुहम्मदशाहास १४१० मध्ये पकडले व त्याची राजधानी फिरोझाबाद हस्तगत केली. मुहम्मदशाह १४१२ मध्ये मरण पावला आणि त्याच्या दरबारातील दौलतखान लोदी गादीवर आला पण त्याचा पराभव करून खिज्रखानाने सय्यद घराण्याची दिल्लीवर स्थापना केली (६ जून १४१४). त्याने विश्वासू अधिकारी नेमून तुघलकांच्या सरदारांना दयाबुद्धीने वागविले. गोरगरिबांसाठी मदतकार्य केले. तैमूरच्या कृपेमुळे आपल्याला सत्ता व प्रतिष्ठा प्राप्त झाली, म्हणून तो तैमूरचा मुलगा शाहरूख याला अखेरपर्यंत खंडणी व नजराणे पाठवीत असे. शाह ही पदवी धारण न करता तो स्वत:स रायत-इ-आला म्हणवून घेत असे. सुरूवातीस तीन वर्षे सार्वजनिक प्रार्थनेतही त्याने शाहरूखचेच नाव ठेवले. त्याने पूर्वीची नाणी सन बदलून वापरात आणली व नवीन पाडली नाही. तुर्क-अफगाणांनी केलेले उठाव त्याने मोडून काढले. त्याचे राज्य दिल्ली व आसपासचा परिसर असे मर्यादित होते. फक्त त्याने नागौरची एकच दूरवरची स्वारी १४१६ मध्ये गुजरातच्या अहमदशाहाविरूद्ध केली. तसेच १४२१ मध्ये मेवात लुटले आणि कोटलाचा किल्ल उध्वस्त केला. तो निर्व्यसनी व न्यायी होता.

Click link

https://vishwakosh.marathi.gov.in/33798/ 

No comments:

Post a Comment