Friday 22 January 2021

मोगलकाळ


मोगलकाळ : हिंदुस्थानात तेराव्या शतकात मुस्लिम सत्तेचा उदय झाला आणि औरंगजेबाच्या मृत्यूनंतर (१७०७) तिला अवनत अवस्था प्राप्त झाली. दिल्लीच्या सुलतानशाहीचा मोगलपूर्व काळ हा भारतातील मुस्लिम सत्तेचा पहिला कालखंड ठरतो. [→ मुसलमानी अंमल, भारतातील]. सुलतानशाहीच्या ऱ्हासानंतर साधारणतः इ. स. १५२६ ते १७०७ दरम्यानच्या काळाला मोगलकाळ ही संज्ञा रूढ झाली आहे. काही इतिहासकार मोगलकाळाची सांगता दुसरा बहादुरशाह याच्या पदच्युतीने झाली (१८५७) असे मानतात. या काळात मोगलांचे राज्य वाढतवाढत जवळजवळ सर्व हिंदुस्थानावर पसरले होते. इतिहासाच्या इतर कालखंडांप्रमाणेच मोगलकाळाबद्दलसुद्धा इतिहासकारांमध्ये एकवाक्यता आढळत नाही. राज्याची साधनसामग्री, साम्राज्यविस्तार, कला-वाङ्‌ममयीन क्षेत्रांतील निर्मिती, प्रशासन, लष्करी व्यवस्था, परराष्ट्रीय संबंध, व्यापार-उदीम आदी दालनांतील भरभराट यांमुळे मोगलकाळाने समृद्धीचा मोठा टप्पा गाठलेला होता.

ऐतिहासिक साधने : मोगलकाळाविषयीची ऐतिहासिक साधनसामग्री विपुल प्रमाणात उपलब्ध झाली आहे. तीत विविध प्रकारची नाणी, पुरातत्त्वीय अवशेष यांबरोबरच तुर्की, फार्सी, अरबी इ. भाषांत लिहिलेली आत्मचरित्रे, तवारिखा, फर्माने, पत्रे, आज्ञा इत्यादींचा भरणा आहे. आत्मचारित्रात तूझुक-इ-बाबुरी (बाबर) आणि तूझुक-इ-जहांगिरी (जहांगीर) ही अत्यंत महत्त्वाची असून काही सम्राटांनी राजदरबारातील इतिहासकारांकडून वृत्तांत (दिवान) लिहून घेतले. याशिवाय गॅझेटीअरच्या धर्तींवर व विशेषतः महसूलाच्या संदर्भात तयार केलेले दस्तूर-उल्-अमल आणि अखबारात-इ-दरबार-इ-मुअल्ला नावाचे वृत्तांत प्रसिद्ध आहेत. यांपैकी अनेकांचे विविध भाषांत भाषांतर झालेले आहे. बाबराच्या आत्मचरित्राचे नाव बाबरनामा किंवा तूझुक-इ-बाबरी असून त्यात पुढील कालखंडांतील- १५०८–१९, १५२०–२५ आणि १५२९–३०-घटनांची नोंद नाही. याखेरीज काही ऐतिहासिक कालखंड यात वगळलेले आहेत.

Click here more Information

https://vishwakosh.marathi.gov.in/30517/ 

No comments:

Post a Comment